बीड : सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणाला ६ महिने उलटून गेले.मात्र अद्याप या प्रकरणातला एक आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे.त्याला तात्काळ अटक करा त्याच्यापासून आमच्या जीवितास धोका आहे त्याला अटक न केल्यास मी लवकरच कठोर निर्णय घेणार असल्याचं धनंजय देशमुख यांनी आज जाहीर केलंय. बीडमध्ये सुनावणीच्या दिवशी न्यायालयाच्या परिसरात आरोपींचे समर्थक आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पदाधिकारी हे पक्ष चिन्ह असलेल्या गाड्या मोठ्या संख्येने आणून वातावरण भयभीत करून कुटुंबावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. वेळोवेळी मागणी करून देखील सर्व आरोपी एकाच जेलमध्ये आहेत त्यांना वेगवेगळ्या जेलमध्ये पाठवावं. असं न झाल्यास मी कठोर निर्णय घेणार असून त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल असा इशारा धनंजय देशमुख यांनी दिलाय.
९ डिसेंबर २०२४ रोजी बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेनंतर वाल्मिक कराडसह इतर आरोपी मकोका अंतर्गत अटकेत आहेत. या प्रकरणाला सहा महिने पूर्ण झाले असून अजूनही कृष्णा आंधळे हा आरोपी फरार आहे.
’लवकरच मी कठोर निर्णय घेणार आहे. फरार आरोपी कृष्णा आंधळे ला अटक करा ही आमची वारंवार मागणी आहे. जेल प्रशासनातील मागील काही दिवसांपासून दिली जाणारी व्हीआयपी ट्रीटमेंट बघता आरोपींना वेगवेगळ्या कारागृहात पाठवावं ही आमची मागणी होती. पण तसं काहीही झालं नाही. त्यावेळेस असं सगळं असताना बीड कोर्टात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे चिन्ह असलेल्या गाड्या, पदाधिकारी, आरोपींचे समर्थन करणारे लोक मोठ्या प्रमाणात येत देशमुख कुटुंबावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. भीतीयुक्त वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. बाकी इतर कुठल्याही प्रकरणातील आरोपी जेर बंद होतात मात्र देशमुख कुटुंबातील कृष्णा आंधळे २०४ दिवसांपासून फरार आहे .त्याच्यापासून आमच्या जीविताला धोका आहे .त्यामुळे लवकरात लवकर कृष्णा आंधळेला अटक करण्यासाठी मी कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत आहे .याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनाची असेल .या मागणीची गंभीर दखल घ्यावी’ असे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख म्हणाले .