बीड : वडवणी तालुक्यातील चिखलबीड येथील शेतकर्यांची जमीन तलावात गेलेल्या जमिनीचा संपूर्ण मावेजा १० वर्षानंतरही दिला नाही. यामुळे माजलगाव न्यायालयाच्या आदेशाने थेट जिल्हाधिकारी यांची गाडी जप्त करण्याचे आदेश दिले होते. या आदेशावरून सोमवारी (दि.१७) जिल्हाधिकार्यांची गाडी जप्त करून न्यायालयात जमा केल्याने खळबळ उडाली आहे.
वडवणी तालुक्यातील चिखलबीड येथील शेतकरी शिवाजी टोगे, संतोष टोगे व बाबू मुंडे या शेतकर्यांची जमीन लघु सिंचन तलावासाठी शासनाने संपादित केली होती व या जमिनीचा अत्यंत तुटूपुंजा मावेजा त्यांना देण्यात आला होता. त्यामुळे या शेतकर्यांनी माजलगाव येथील सत्र न्यायालयात धाव घेत यासाठी दावा दाखल केला होता.
या दाव्यावर न्यायालयाने संबंधित शेतकर्यांचे म्हणणे अंशतः मान्य करून ऑक्टोबर २०१५ मध्ये या शेतकर्यांना वाढीव मावेजा द्यावा असा निकाल दिला होता. मात्र शासनाने काही प्रमाणात रक्कम देऊन संपूर्ण रक्कम देण्यास चालढकल केली. त्यामुळे माजलगाव न्यायालयाचे सह. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस. पी. बुधवंत यांनी सदर रकमेला व्याज लावून सदर रक्कम वसूल करण्यासाठी जिल्हाधिकारी यांची गाडी जप्त करण्याचे आदेश दहा दिवसापूर्वी पारित केले होते.
त्यानुसार कोर्टाने वादी यांचे वकील यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी यांना मावेजा बाबत सोमवारी आपली बाजू मांडली व रक्कम अदा करणे बाबत सांगितले; परंतु जिल्हाधिकारी यांनी पैशाची पूर्तता करू शकत नाही तुम्ही गाडी घेऊन जा, असे सांगितल्याने कोर्टाच्या बेलीपने जिल्हाधिकारी यांची गाडी क्रमांक एम एच २३ बीसी २४०१ ही गाडी कायदेशीर बाबीची पूर्तता करून जप्त करून माजलगाव न्यायालयात जमा केली आहे. शेतकर्यांच्या वतीने ऍड बाबुराव तिडके, एस.एस.मुंडे यांनी बाजू मांडली.