ब्राह्मणवाडेत पितृस्मरणाचा नवा आदर्श
ज्ञानेश्वर काकड | नाशिक
ब्राम्हणवाडे गावी शाबा गेणूजी माळी ह्यांचे हृदयविकाराने निधन झाले त्यांच्या स्मरणार्थ भिका शाबा माळी व भास्कर शाबा माळी ह्या दोन्ही मुलांनी वडिलांच्या अस्थी नदीत न विसर्जित करता शेतात वृक्षारोपण करण्यात आले.
परंपरेला पर्यावरणाची जोड देत समाजाला नवा विचार देणारा प्रेरणादायी उपक्रम अलीकडे राबविण्यात आला. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या मुलांनी अस्थी नदीत विसर्जित न करता स्वतःच्या शेतात टाकून वृक्षारोपण केले आणि पर्यावरण संवर्धनाचा आगळा संदेश समाजासमोर ठेवला.मरणानंतरही जीवन देण्याची प्रेरणा मिळावी या भावनेतून मुलांनी वडिलांच्या स्मरणार्थ विविध देशी वृक्षांची लागवड केली.वडील ज्या शेतात आयुष्यभर राबले, त्याच शेतात झाडांच्या रूपाने त्यांचे स्मरण कायम राहावे, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश होता.
या उपक्रमामुळे केवळ भावनिक समाधान मिळाले नाही, तर पर्यावरण रक्षणालाही हातभार लागला आहे. नदी प्रदूषण टाळत वृक्षारोपणास प्राधान्य देण्याचा हा विचार समाजात चर्चेचा विषय ठरत असून अनेकांनी या निर्णयाचे कौतुक केले आहे.परंपरा जपत, बदलत्या काळानुसार निसर्गपूरक मार्ग स्वीकारण्याचा हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरेल, अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. वडिलांच्या आठवणी झाडांच्या रूपाने जिवंत ठेवत पुढील पिढीसाठी हिरवे भविष्य घडवण्याचा संदेश या कृतीतून दिला गेला आहे. ह्या प्रसंगी पोलिस पाटील कमलाकर रामराजे उपस्थित होते.

