शिष्टमंडळ घेणार मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याची यांची भेट – बाळासाहेब सानप
बीड : बीड जिल्हा परिषद शिक्षण विभागातील बिंदू नामावलीतील अनियमितता सध्या मोठ्या चर्चेचा विषय ठरत आहे. शिक्षण विभागाने तयार केलेल्या बिंदू नामावलीमध्ये गंभीर चुका असल्याचा आरोप अनेक शिक्षक संघटनांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी केला असून, यावर तातडीने कारवाईची मागणी होत आहे.
या बिंदू नामावलीत भटक्या-विमुक्त जातींच्या जागा जाणीवपूर्वक जास्त दाखवण्यात आल्याचा आरोप करत, शिक्षकांच्या निवडीच्या मूळ आदेशातील प्रवर्गाचा विचार न करता, फक्त जातीवर आधारित वर्गीकरण करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. परिणामी, भटक्या-विमुक्त जातींमध्ये पदसंख्या फुगवून चुकीचे आकडे सादर केल्याचे निदर्शनास आले आहे.
विशेष म्हणजे, १ मार्च २०१४ रोजीचा शासन निर्णय स्पष्टपणे सांगतो की, वस्तीशाळा शिक्षकांचे मूळ प्रवर्गाचे बिंदू उपलब्ध नसल्यास, त्यांना खुल्या प्रवर्गात किंवा शून्य बिंदूवर समाविष्ट करावे. मात्र, याचा पूर्णपणे फज्जा उडवत शिक्षण विभागाने काही शिक्षकांना त्यांच्या जातीवर आधारित बिंदूंवर समाविष्ट केल्याचा गंभीर आक्षेप आहे.
या प्रकाराविरोधात संबंधित अधिकार्यांना वेळोवेळी निवेदने सादर करण्यात आली, मात्र प्रशासनाने अद्यापही दुरुस्ती करण्याचे टाळाटाळ केल्याचे आरोप करण्यात येत आहेत. यामुळे अनेक शिक्षकांचे हक्क डावलले जात असून, आरक्षणातील इतर प्रवर्गांवरही अन्याय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर सन्माननीय बाळासाहेब सानप यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्र्यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. बिंदू नामावलीतील घोटाळा निष्पक्षपणे तपासून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या शिष्टमंडळात केली जाणार आहे.
या घोटाळ्यामुळे शिक्षण विभागाच्या पारदर्शकतेवर मोठा प्रश्नचिन्ह उभे राहिले असून, प्रशासनाच्या भूमिकेबाबतही संशय व्यक्त केला जात आहे. आता मुख्यमंत्री आणि इतर वरिष्ठ अधिकार्यांची भेट झाल्यानंतर या प्रकरणाला कोणती कलाटणी मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.