बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येतोय. अनेक दिवस उलटून देखील देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी फरार आहेत. दरम्यान, आरोपींना अटक होत नसल्याने बीडमध्ये आज (दि.२८) सर्व पक्षीय मोर्चा काढण्यात आला. आरोपींना तात्काळ अटक करत फाशी देण्यात यावी, अशी मागणी आंदोलक आणि मोर्चात सहभागी झालेल्या नेत्यांनी केली. दरम्यान, आता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीला महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत.
बीड प्रकरणात दोन मोठ्या अपडेट समोर आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीला दोन महत्त्वाचे आदेश दिले आहेत. बीड प्रकरणात जे आरोपी फरार आहेत, त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक बुरडे यांना दिले आहेत. बंदुकी सोबत ज्यांचे-ज्यांचे फोटो आहेत, ते जर खरे असतील तर त्या सर्वांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा, असेही आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. शिवाय तातडीने फेर आढावा घेण्यासही सांगण्यात आले आहे.