विधानसभा निवडणुकीत भाजप-महायुतीला ऐतिहासिक यश मिळाले. महायुतीमध्ये मागील चार दिवस चर्चा सूरुच राहिल्याने मुख्यमंत्री कोण होणार, हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत राहिला आहे. दरम्यान, भाजपकडून एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदासाठी विचारण्यात आले आहे. मात्र त्यांनी उपमुख्यमंत्री पदासाठी इच्छूक नसल्याची माहितीचे वृत्त समोर येत आहे.
एकनाथ शिंदे यांच्या या भूमिकेमुळे मुख्यमंत्रीपदाबाबत अजून कुठलाही निर्णय होत नसल्याची माहिती देखील समोर आली आहे. शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद न स्वीकारल्यास शिंदे यांच्या शिवसेनेमधील दोन नावांचा प्रस्ताव सादर करण्यात येईल, असेही सूत्रांनी म्हटलं आहे.
शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी ’बिहार मॉडेल’चा दाखला देत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदी कायम राहावे, असे म्हटलं होतं. मात्र शिवसेनेच्या काही नेत्यांनी सुचविलेल्या ’बिहार मॉडेल’ महाराष्ट्रात राबविण्यास भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाने नकार दिला आहे. मागील चार दिवस चर्चा सूरुच राहिल्याने मुख्यमंत्री कोण होणार, हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत राहिला आहे.
बिहारमध्ये ’एनडीए’ सत्तेत आहे. राज्यात भाजप आमदारांची संख्या जास्त असली तरी जेडी(यू) प्रमुख नितीश कुमार मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्रात बिहार सारखी परिस्थिती नाही असे स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रात पक्षाकडे मजबूत संघटनात्मक नेतृत्त्व आहे, असे असल्याच्या भाजपचे प्रवक्ते प्रेम शुक्ला यांनी स्पष्ट केल्याचे वृत्त ’द इंडियन एक्सप्रेस’ने दिले आहे. भाजपने बिहारमधील प्रचारादरम्यान नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या वचनबद्धतेचा सन्मान केला आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी कायम राहावेत, अशी बांधिलकी पक्षाने केलेली नाही, असेही प्रेम शुक्ला यांनी स्पष्ट केले आहे.