मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सोमवारी सांगता झाली. आता उद्या म्हणजे मंगळवारी महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघांमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर फलोदी सट्टाबाजारातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. फलोदी सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येण्याचा अंदाज आहे. तर महाविकास आघाडील पुन्हा एकदा विरोधी पक्षात बसावे लागणार आहे. यापूर्वी फलोदी सट्टा बाजाराने हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालाविषयी अंदाज वर्तवला होता. मात्र, हा अंदाज फेल ठरला होता.
आता फलोदी सट्टा बाजाराने महाराष्ट्र आणि झारखंडमधील निवडणुकीच्या निकालांविषयी भाकीत केले आहे. त्यानुसार महाराष्ट्रात महायुतीला २८८ पैकी १४४ ते १५२ जागांवर विजय मिळू शकतो. महाराष्ट्रात बहुमतासाठी १४५ जागांची गरज आहे. त्यामुळे फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज खरा ठरल्यास राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येईल. तर महाविकास आघाडी महायुतीला जोरदार टक्कर देईल, असा अंदाज आहे. भाजपला ८७ ते ९० जागा मिळू शकतात, असा फलोदी सट्टा बाजाराचा अंदाज आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सत्तास्थापनेसाठी महायुतीवर ४० पैसे तर महाविकास आघाडीवर २ ते २.५० रुपयांचा भाव लागताना दिसत आहे.
याशिवाय, झारखंडमध्येही भाजपला ५५ जागांवर विजय मिळण्याचा अंदाज आहे. झारखंडमध्ये विधानसभेच्या एकूण ८१ जागा आहेत. यापैकी ५५ जागांवर मिळाल्यास भाजपला झारखंडमध्ये एकहाती सत्ता स्थापन करता येऊ शकते. त्यामुळे आता फलोदी सट्टा बाजाराचे हे अंदाज महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये कितपत खरे ठरणार, हे आता २३ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होईल. दरम्यान, मतदानाला अवघे काही तास उरल्याने आता महाराष्ट्रातील उमेदवारांच्या मनातील धाकधूक वाढली आहे. उद्या राज्यात किती टक्के मतदान होते, यावरही बर्याच गोष्टी अवलंबून असतील.
महाराष्ट्रातील २८८ विधानसभा मतदारसंघात बुधवारी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होईल. त्यासाठी ईव्हीएम यंत्रे कडेकोट पोलीस बंदोबस्तात मतदान केंद्रांपर्यंत पोहोचवण्यात आली आहेत. यंदाच्या निवडणुकीत २०४ महिलांसह ४,१३६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राज्यातील तब्बल ९ कोटी मतदारांसाठी १ लाख ४२७ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाईल.