अखिल भारतीय रविदासीया धर्म संगठनचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.सुखदेवजी महाराज यांची उपस्थिती
बीड : संत गुरु रविदास महाराज अध्ययन केंद्र, साहित्याचा स्टॉल, ग्रंथालय व गोपीनाथ गाडे यांचे घर आणि दुकान जाळणार्या आरोपींना अटक करून कडक शिक्षा व्हावी व गाडे कुटुंबाचे पुर्नवसन करण्यात यावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चर्मकार समाजाच्या वतीने राज्यस्तरीय धरणे आंदोलन करून जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,, रविदासाचार्य गोपीनाथ गाडे हे संत गुरु रविदास महाराज यांचे प्रचारक असून सामाजिक कार्यकर्ते आहेत अनेक दिवसांपासून दौलावडगाव, ता. आष्टी, जि. बीड येथील काही जातीवादी गावगुंडांनी हेतूपुरस्कर गाडे कुटुंबाला गावातून हुसकावून लावण्यासाठी मागील अनेक वर्षापासून त्रास देण्याचा प्रकार करीत होते. यासंदर्भात अंभोरा पोलीस स्टेशन येथे आरोपी यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री जातीयवादी गाव गुंडांनी गोपीनाथ गाडे यांचे घर, दुकान व संत गुरु रविदास महाराज अध्ययन केंद्र जाळून राख रांगोळी केली. सुदैवाने या घटनेवेळी गाडे कुटुंब बाहेरगावी असल्याने ते या दुर्घटनेतून बचाावले आहे. या घटनेने गाडे कुटुंब भयभीत झाले असून जवळपास ५० लाखाचे नुकसान झाले आहे.या घटने संदर्भात अंभोरा तालुका आष्टी जिल्हा बीड येथे गुन्हा दाखल झाला आहे. मात्र मोकाट आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावे व जलद गती कोर्टात दावा दाखल करून आरोपींना कडक शिक्षा करण्यात यावे. संत रविदास अध्ययन केंद्र व गाडे कुटुंबाचे घर, दुकान पुन्हा पूर्ववत जागेवर बांधून पुर्नवसन करण्यात यावे. शासनाकडून गाडे कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत करून पोलीस संरक्षण देण्यात यावे.गाडे कुटुंबावर वेळोवेळी होणार्या अन्याया संदर्भात घटनेच्या ४ दिवस अगोदर दिलेले पोलिस संरक्षण काढून घेणार्या अंबोरा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. मंगेश साळवे व पोलिस कर्मचारी अमोल शिरसाठ यांनी आरोपींना पाठीशी घालून आर्थिक तडजोड केल्यामुळे वरील दुर्घटना घडलेली आहे. घटनेला जबाबदार पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना निलंबित करून कडक कारवाई करण्यात यावी. तसेच चर्मकार समाजाच्या भावनांचा आदर करून चर्मकार समाजाला व गाडे कुटुंबाला न्याय देण्यात यावा या मागण्या संदर्भात राज्यस्तरीय आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात अखिल भारतीय रविदासीया धर्म संगठनचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.सुखदेवजी महाराज यांनी देखील सहभाग घेतला. तसेच यावेळी मोठ्या संख्येने चर्मकार समाज बांधवांनी या धरणे आंदोलन सहभाग नोंदवला.
जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनावर अध्यक्ष संजय खामकर, कार्याध्यक्ष वसंतराव धाडवे, महासचिव चंद्रप्रकाश देगलुरकर,यांच्या स्वाक्षर्या आहेत.

