गेवराई : सोलापूर-धुळे महामार्गावर गेवराई शहराजवळील बायपासवर शनिवारी (दि. २४) मध्यरात्री इथेनॉल घेऊन जाणार्या टँकरचा भीषण अपघात झाला. दुभाजकाला धडकून उलटलेल्या या टँकरने पेट घेतल्याने महामार्गावर अग्नितांडव पाहायला मिळाले. मात्र, गे-वराई पोलिसांनी दाखवलेली तत्परता आणि अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांमुळे मोठी दुर्घटना टळली आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
सोलापूर येथून जामनेर (गुजरात) कडे इथेनॉल घेऊन जाणारा हा टँकर शनिवारी रात्री दीड ते दोनच्या सुमारास बीड-धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बाग पिंपळगाव बायपास (बीड बायपास) येथे आला होता.
यावेळी पाठीमागून आलेल्या एका अज्ञात वाहनचालकाने अचानक हुलकावणी दिली. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि टँकर दुभाजकावर आदळून पलटी झाला. टैंकर पलटी होताच घर्षणामुळे आगीचा भडका उडाला. सुरक्षेच्या कारणास्तव बीड आणि धुळे-सोलापूरकडून येणारी वाहने गेवराई शहरातून वळविण्यात आली होती. पहाटेच्या सुमारास आग विझल्यानंतर क्रेनद्वारे जळालेला टैंकर बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

