बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने मागील तीन महिन्यांपासून राज्याचं राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघत आहे. हत्या प्रकरणात निकटवर्तीयांचा सहभाग आढळल्याने निर्माण झालेल्या जनआक्रोशामुळे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. परंतु जवळपास तीन महिन्यांच्या मागणीनंतर हा राजीनामा देण्यात आल्याने मुंडे यांनी निर्णय घेण्यास उशीर केला का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बारामती येथील पत्रकार परिषदेत भाष्य केलं आहे.
बीडमधील घटना आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, बीड जिल्ह्याला मी गेल्या अनेक वर्षांपासून ओळखतो. बीडमध्ये आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे तशी यापूर्वी कधीच नव्हती. सर्व घटकांना सोबत घेऊन जाणारा हा जिल्हा होता. मी स्वत: त्या भागात जेव्हा लक्ष देतो होतो, मी उभे केलेले सहा-सहा सदस्य तिथं आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. जिल्ह्यात एकप्रकारचं सामंजस्याचं वातावरण होतं. पण आता काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली असून त्याचे परिणाम जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून दिसत आहेत. जो कायदा हातात घेतो, तो कोण आहे याचा विचार न करता त्यांच्याविरोधात राज्य सरकारने सक्त भूमिका घेण्याचे धोरण आखण्याची गरज आहे, अशी भूमिका पवार यांनी मांडली आहे.