जालना : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्यावर उतरलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्यात निवडणुका जाहीर होताच संताप व्यक्त केला. आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवार पाडायचे की लढवायचे याचा निर्णय घेण्यासाठी आज अंतरवाली सराटी येथे निर्णायक बैठक पार पडली. बैठकीतून मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली. जिथे निवडून येतील तिथे उमेदवार द्यायचा. जिथे राखीव जागा आहेत तिथला उमेदवार आपल्या विचाराचा असेल. त्याला मतदान करावे. जिथे आपण उभा करणार नाही तिथे जो उमेदवार 500 रुपयाच्या बॉण्डवर आपल्याला समर्थन देईल त्या उमेदवाराला मतदान द्यावे, असे भूमिका मनोज जरांगे यांनी जाहीर केली आहे.