बीड- पुणे, सोलापुरनंतर आता बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील गीता या गावातील शुभांगी संतोष शिंदे या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ऑप्टिकलचे दुकान टाकण्यासाठी सासरच्या मंडळींनी माहेरावरून पैसे आणण्यासाठी छळ केल्याचा आरोप माहेरच्या लोकांनी केला आहे. अंबाजोगाई व धारूर येथे ऑप्टिकलचे दुकान असताना तिसर्या दुकानासाठी वारंवार पैशाची मागणी केली जात होती. माहेरच्या लोकांनी पाच लाख रुपये देऊनही आणखी चार लाख रुपयांसाठी शुभांगी शिंदे हिचा छळ सुरू होता असे पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. शुभांगी शिंदेंचा मृतदेहाचे स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर तिच्या पार्थिवावर गिता येथे काल (गुरूवारी) रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले.
शुभांगी संतोष शिंदे असं आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचं नाव आहे. ती बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील गीता या गावातील रहिवासी होती. तिने सासरच्या मंडळींनी केलेल्या छळामुळे आत्महत्या केल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे.
शुभांगी शिंदे या मृत विवाहितेच्या माहेरच्यांनी, माहेरच्या लोकांनी पाच लाख रुपये देऊनही आणखी चार लाख रुपयांसाठी शुभांगी शिंदे हिचा छळ सुरू होता असे पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तिला अपमानजनक वागणूक दिली जात होती. सासरच्यांकडून सातत्याने सुरू असलेल्या त्रासाला कंटाळून शुभांगीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येची घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून पोलिसांनी शुभांगीचा मृतदेह स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणात शुभांगीच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पाच जणांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात पतीसह सासू-सासरे आणि नणंद यांनी हुंड्यासाठी छळ केल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान या प्रकरणात पती संतोष शिंदे, सासरे विलास शिंदे,सासु सुमन शिंदे,ननंद सीमा शिंदे व पतीचे मित्र संदीप काचगुंडे यांच्या विरोधात भाऊ प्रदीप सोळंके याच्या फिर्यादीवरून बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील पती,सासू-सासरे,ननंद यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर संदीप काचगुंडे हा अद्याप फरार असून त्याचा शोध बर्दापूर पोलीस घेत आहेत. या प्रकरणामुळे गीता गावात हळहळ व्यक्त होत असून, सासरच्या त्रासामुळे आणखी एका विवाहितेचा जीव गेल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मृत महिलेच्या कुटुंबियांनी केली आहे.