छ.संभाजीनगर : पाझर तलावामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या ३ मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली. संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील वैरागड येथे रविवारी दुपारी दोन जिवलग मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर दुसरी घटना शरणापूर शिवारात घडली. यामध्ये एका मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनांमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पाझर तलावात पोहण्यासाठी गेलेल्या ३ मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. पहिली घटना गंगापूर तालुक्यातील वैरागड शिवारात आणि दुसरी घटना छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील शरणापूर शिवारात घडली. पोहण्यासाठी पाझर तलावात हे मुलं उतरली पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला. गौरव प्रकाश शेजवळ (१५ वर्षे) आणि ऋषिकेश सोमनाथ वाघचौरे (१४ वर्षे) हे दोघे जण रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास वैरागड येथील पाझर तलावात पोहण्यासाठी गेले होते. तलावात ते पोहण्यासाठी उतरले पण ते परत बाहेर आलेच नाहीत. तलावात असलेल्या गाळामध्ये अडकल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. गौरव एकुलता एक मुलगा होता तो लासूर स्टेशन येथील न्यू हायस्कूलमध्ये दहावीचे शिक्षण घेत होता. सोमवारी दहावीचा त्याचा शेवटचा पेपर होता. तर गौरवचा मित्र ऋषिकेशने आठवीतूनच अर्धवट शाळा सोडून दिली होती. तो कुटुंबीयांना शेतकामासाठी मदत करत होता. ऋषिकेश आणि गौरव एकाच गावातील होते. त्यांच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा परसरली आहे. तर दुसरी घटना शरणापूर शिवारात घडली. याठिकाणी अजय संजय मिसरे याचा पाझर तलावात बुडून मृत्यू झाला. वंजारवाडी येथील अजय मिसरे शेळ्या चारण्यासाठी शेतात गेला होता. शरणापूर पाझर तलावात त्याने शेळ्यांना पाणी पाजले. त्यानंतर त्याने तलावात पोहण्यासाठी उडी मारली. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्याचा देखील पाण्यात बुडून मृत्यू झाला.