माजलगाव : टाकरवन ग्रामपंचायत अंतर्गत असलेला फुलसिंग नगर तांडा येथील अंगणवाडीतील बालकांना खिचडीतून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. बालकावर माजलगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती संबंधित अंगणवाडी अधिकार्यांकडून देण्यात आली आहे.
शनिवारी सकाळी अंगणवाडीत बालकांना खिचडीचा खाऊ देण्यात आला होता. अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली आहे. अंगणवाडीत दिलेली खिचडी दहा बालकांनी खाल्ल्यानंतर त्यांना मळमळ होऊन उलटी आधीचा त्रास सुरू झाला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बालकांच्या नातेवाईकांनी त्यांना थेट टाकरवन येतील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणले.
या ठिकाणावरून त्या बालकांना लगेच जिल्हा रुग्णालय माजलगाव या ठिकाणी हलवण्यात आले. हे अन्न खाल्ल्याने दहा बालकांना विषबाधा झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेची माहिती संबंधित तालुका अंगणवाडी अधिकारी तसेच गट शिक्षण अधिकारी यांना माहित होताच त्यांनी थेट रुग्णालय गाठून बालकांच्या तब्येतीची विचारपूस केली. सर्व बालकाची तब्येत स्थिर असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अंगणवाडीत शिजवण्यात आलेली खिचडीचे नमुने तपासणी करता बीड या ठिकाणी पाठवण्यात आल्याची माहिती अंगणवाडी प्रशिक्षिका ढाले यांनी सांगितले.