जालना : सध्या राज्यातील राजकीय वातारण चांगलंच तापलं असून नेतेमंडळीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला जात आहे. महाविकास आघाडी व महायुतीकडून उमेदवारांची यादी जाहीर होत असून महायुतीने आत्तापर्यंत 182 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली असून महाविकास आघाडीतील शिवसेना युबीटी पक्षाने 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यामुळे, अद्यापही काँग्रेस व राष्ट्रवादीच्या उमेदवारांची प्रतिक्षा सर्वांनाच लागून आहे. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्याकडेही इच्छुक उमेदवारांची गर्दी वाढत असून रात्री उशिरापर्यंत त्यांना भेटून मतदारसंघातील राजकीय परिस्थिती व उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुकांकडून मागणी केली जात आहे. दरम्यान,मनोज जरांगेंनी अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. एका युट्यूब चॅनेलच्या कमेंटमधून ही धमकी देण्यात आल्याने ऐन निवडणुकीत मनोज जरांगे यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण केले जात आहेत.
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे यांना अज्ञाताकडून धमकी देण्यात आली आहे. एका युट्यूब चॅनलच्या कॉमेंटमध्ये अज्ञाताकडून ही धमकी देण्यात आली असून कॉमेंटचा स्क्रिन शॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उमेदवारीसाठी इच्छुक म्हणून येऊन गेम करणार अशा आशयाची ही धमकी असल्याचं कॉमेंटमध्ये लिहिण्यात आलं आहे. बजाज बिश्नोई लीडर नावाच्या फेक अकाऊंटवरुन ही धमकी दिली जात आहे. त्यामळे, मनोज जरांगेंच्या भेटीसाठी येणार्या उमेदवारांची किंवा बैठकी दरम्यान आतमध्ये जाणार्या सर्वांची आता तपासणी केली जाणार असल्याचे समजते. दरम्याान, मनोज जरांगे सध्या बसत असलेल्या सरपंच मळा येथील बैठकीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दरम्यान, प्रत्येक मतदारसंघात चार ते पाच जणांनी फॉर्म भरून ठेवायचे आहेत. 29 किंवा 30 तारखेला मतदार संघ जाहीर करू. तेव्हाच उमेदवार ही जाहीर करू. चिन्ह आल्याशिवाय उपयोग नाही,असं मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या तारखांनुसार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 29 ऑक्टोबर ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख असणार आहे. तर, 4 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज माघारी घेता येईल.