जालना : आमरण उपोषणामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. मनोज जरांगे समर्थक आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी उपचार घेण्याची विनंती केली होती. अखेर मनोज जरांगे पाटील यांनी मध्यरात्री पावणेदोन वाजता उपचार घेतले.
मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. कालपासूनच जरांगे यांची प्रकृती खालावली होती. यानंतर मोठ्या प्रमाणात लोकांनी त्यांना उपचार घेण्याची विनंती केली होती. त्यानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील मनोज जरांगे यांना फोन करुन उपचार घेण्याची केली विनंती केली होती. त्यानंतर जरांगे यांनी उपचार घेतले आहेत. मध्यरात्री पावणेदोन वाजता मनोज जरांगे यांना डॉक्टरांकडून सलाईन लावण्यात आले. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस होता. यावेळी मध्यरात्री मनोज जरांगे समर्थक आंदोलकांनी त्यांना उपचार घेण्याचा आग्रह केला. या आग्रहानंतर त्यांनी उपचार घेण्यास होकार दिल्याने त्यांच्यावर आता उपचार करण्यात आलेत.
सगेसोयरेच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करुन मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. दरम्यान, त्यांची प्रकृती खालावली आहे. जरांगेंना उपोषणाच्या चौथ्या दिवशी चालणं देखील मुश्कील झालं होतं. सहकार्यांचा आधार घेत ते चालताना दिसत होते. मनोज जरांगे यांना थकवा जाणवतोय. ते स्टेजवरून खाली उतरताना अचानक खाली बसलेले पाहायला मिळाले. यावेळी त्यांना उठता येत नव्हते. दरम्यान, सरकारकडून मनोज जरांगेंना कोणता प्रतिसाद मिळतोय का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. आजवर मराठा समाजाने सहकार्याचीच भूमिका घेतली आहे. एक वर्षापासून लढा सुरू आहे. लाखोंची जनता रस्त्यावर उतरल्याच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याच वाईट वाटायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया म्हणून जरांगे यांनी दिली होती. मनोज जरांगेंचे सध्या सहावे उपोषण सुरु आहे. त्यामुळं यावर आता सरकार काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.