जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
बीड: जिल्ह्यात आखाती देशांमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाई निर्माण झाल्याच्या अफवा पसरत असल्याने पेट्रोल पंपांवर नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. मात्र, जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून पुरवठा सुरळीत सुरू असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी शिवकुमार स्वामी यांनी आज, ४ मार्च रोजी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
सध्या आखाती देशांतील तणावामुळे इंधन टंचाई होईल या भीतीने अनेक ठिकाणी नागरिक वाहनांमध्ये अतिरिक्त इंधन साठवण्यासाठी गर्दी करत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा तुटवडा नाही. सर्व पेट्रोल पंप कंपन्यांच्या प्रतिनिधींना पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता अफवांकडे दुर्लक्ष करावे आणि पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी टाळावी. चुकीची माहिती किंवा अफवा पसरवणार्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. जनतेने संयम राखून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

