बीड : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गेवराई नजीक गढीजवळ भीषण अपघातात सहा जणांचा गंभीर जखमी होवून मृत्यू झाला. अपघाताची ही घटना सोमवारी (दि.२६) रात्री १०.३० ते १०.४५ वाजेच्या सुमारास घडली. माहिती मिळताच गेवराई पोलिस आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या माहितीनुसार, आयशर टेम्पोने टोचन करुन नेण्यासाठी चारचाकी वाहनाजवळ थांबलेल्या सहा जणांना भरधाव वेगात धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला.अपघातानंतर टेम्पोसह चालक फरार झाल्याचे सांगण्यात आले.
रविवारी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर गढी येथील कारखान्यासमोर आतकरे यांच्या मुलाचा एक्स यू व्ही वाहन डिव्हायडरवर आदळून किरकोळ अपघात झाला होता. या अपघातात कुणीही जखमी झाले नव्हते. मात्र, डिव्हायडरमध्ये अडकलेली गाडी बाहेर काढण्यासाठी आतकरे आणि त्यांचे काही सहकारी घटनास्थळी आले असता, अचानक भरधाव वेगात आलेल्या आयशर ट्रकने त्यांना जबर धडक दिली. या भीषण धडकेत बाळू आतकरे, मनोज करांडे, कृष्णा जाधव, दिपक सरोया, भागवत परळकर आणि सचिन ननवरे यांचा मृत्यू झाल्याची माहिती समजते आहे. तर एक व्यक्ती गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघातानंतर काही वेळातच गेवराई पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. अपघाताच्या ठिकाणी अजून एक दुय्यम अपघातही घडला असून त्यातही एकजण जखमी झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गेवराई तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून, नागरिकांनी या मार्गावर वाहतुकीदरम्यान अधिक काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात येत आहे.