19 जखमी;टायर फुटल्याने भिषण अपघात
आष्टी तालुक्यात आज सकाळी मजूरांना घेऊन जाणारा पिकअप जीप याचे टायर फुटल्याने तीन मजुरांचा मृत्यू झाला तर 19 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. सदरील हा अपघात कामगार दिनाच्या दिवशी झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सदरील जखमींना परिसरातील लोकांनी मदत करून त्यांना उपचारासाठी रूग्णालयात पाठविण्यात आले. सदरील पिकअपचे टायर गरम झाल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्र दिना दिवशी गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास कडा ते देवीनिमगाव रस्त्यावर सासू सुनेच्या माळाजवळ मजूर वाहतूक करणार्या वाहनाचा टायर फुटून मोठा अपघात झाला. या दुर्घटनेत 22 मजूर प्रवास करत होते. अपघातात श्रावणी विक्रम महाजन (वय 14), ऋतुजा सतीश महाजन (वय 16), व अजित विठ्ठल महाजन (वय 14) या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. याशिवाय दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील उपचारासाठी अहमदनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. उर्वरित 11 जणांवर कडा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर कडगावचे माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते अनिल तात्या ढोबळे, तसेच धामणगावचे माजी सरपंच संजय गाढवे यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णवाहिकेच्या सहाय्याने रुग्णालयात दाखल केले. कडा, धामणगाव व देवीनिमगाव येथील ग्रामस्थांनी देखील तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यात सहभाग घेतला. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.