जालना : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्यासाठी जरांगे यांच्याकडून चर्चा केली जात होती. त्यांनी ३ ऑक्टोबर रोजी कोणकोणत्या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवणार, याची माहिती दिली होती. तसेच कोणत्या जागेवरील उमेदवार पाडण्याचे काम करायचे याबाबतही सांगितले होते. त्यानंतर आज जरांगे यांनी आज मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे.
मनोज जरांगे यांनी आज (४ ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आज विधानसभा निवडणुकीसंदर्भात आपली भूमिका जाहीर केली. आम्ही रात्री साडेतीनपर्यंत चर्चेला बसलो होतो. आम्ही या निवडणुकीत मित्रपक्षांसोबत दलित आणि मुस्लीम उमेदवार उभे करणार होतो. कारण, एका जातीच्या जोरावर निवडणूक लढणे आणि जिंकणे शक्य नाही. आम्ही राजकारणात नवखे आहोत. उमेदवार उभा करुन तो पडला तर जातीची लाज जाईल. त्यामुळे आम्ही विधानसभा निवडणूक लढवायची नाही, असा निर्णय घेतला. त्यामुळे माझी सगळ्या मराठा उमेदवारांना विनंती आहे की, सगळ्यांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घ्यावेत. निवडणूक हा काही आपला खानदानी धंदा नाही. एका जातीच्या जोरावर निवडणूक जिंकणे शक्य नाही. एका जातीवर पुढे जाणे शक्य नाही, हे एकमताने ठरवण्यात आले. त्यामुळे आपण निवडणूक लढायची नाही, असा निर्णय घेण्यात आला. फक्त उमेदवार पाडायचे, असे आमच्या बैठकीत ठरल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.